Tuesday, April 21, 2020

बुद्धाचा सिद्धांत

बुद्धाचा सिद्धांत
        सर्वसाधारणपणे बुद्धाचा अहिंसेच्या तत्त्वांशी संबंध जोडण्यात येतो . त्याच्या शिकवणुकीचा तो आदि व अंत असल्याचे मानले जाते . बुद्धाने शिकवले ते अहिंसेच्याही फार पलीकडचे , अत्यंत व्यापक आहे , हे क्वचितच कोणाला माहीत असेल , म्हणून त्याची तत्वे तपशीलवार मांडणे आवश्यक आहे . त्रिपिटकाच्या वाचनातून मला जी तत्त्वे समजली ती मी खाली नमूद करीत आहे .
१ . स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे .
२ . प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही .
३ . धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे . त्याचा ईश्वर किंवा आत्मा , स्वर्ग किंवा पृथ्वी यांविषयीच्या सिद्धांतांशी व कल्पनांशी संबंध असता कामा नये .
४ . ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे अयोग्य आहे .
५ . आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे .
६ . प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे . ७ . खरा धर्म माणसाच्या मनात बसत असतो , शास्त्रात नव्हे . ८ . मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे . जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल .
९ . जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा.
१० . धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे आहे , त्याचा आरंभ वा अंत याचे स्पष्टीकरण करणे नव्हे .
११ . हितसंबंधांच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय .
१२ . संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते .
१३ . समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे .
१४ . सर्व मानव समान आहेत .
१५ . माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते .
१६ . महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श ; उच्च घराण्यातील जन्म नव्हे .
१७ . सर्वांबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये . आपण त्यासाठी आपल्या शत्रूचेदेखील ऋणी असले पाहिजे .
१८ . प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा , अध्ययन करण्याचा हक्क आहे . माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे विद्येचीही आवश्यकता आहे .
१९ . सदाचरणाशिवाय ज्ञान हे घातक होय .
२० . कोणतीही गोष्ट अंतिम ( अस्खलनशील ) नाही . कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही . प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यांस पात्र आहे .
२१ . कोणतीही गोष्ट अंतिम नाही .
२२ . प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावाच्या नियमाला धरून आहे . २३ . कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही . प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील ( बदलास पात्र ) आहे . अस्तित्व हे नेहमीच घडत असते . किंबहुना परिवर्तनशीलता हाच जगाचा नियम होय .
२४ . युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक आहे .
२५ . विजेत्याची जितांबाबत काही कर्तव्ये आहेत .
        संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्त्वे ही आहेत . फार प्राचीन काळात जरी सांगितलेली असली तरीही आजही ती तितकीच नवीन वाटतात . ( किती प्राचीन , पण किती नवीन ! )

लेखक :- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

No comments:

Post a Comment