Tuesday, April 21, 2020

कार्ल मार्क्सचा सिद्धांत

कार्ल मार्क्सचा सिद्धांत

        आता आपण कार्ल मार्क्सने मुळात प्रतिपादन केल्याच्या तत्त्वांचे विवेचन करू ( त्याच्या तत्त्वांकडे वळू या ) . कार्ल मार्क्स हा आधुनिक समाजवादाचा अथवा साम्यवादाचा जनक आहे यात शंका नाही . परतु केवळ समाजवादाचा सिद्धांत प्रतिपादन करण्यात त्याला स्वारस्य नव्हते . ती गोष्ट त्याच्याही फार पूर्वी इतरांनी केली होती . मार्क्सला त्याचा समाजवाद  वैज्ञानिक होता हे सिद्ध करण्यात अधिक स्वारस्य होते . त्याची चळवळ भांडवलदारांविरुद्ध जशी होती तशीच ती ज्यांना त्याने स्वप्नरंजित किंवा अव्यावहारिक समाजवादी म्हटले त्यांच्याविरुद्धही होती . आपला समाजवादाचा प्रकार हा वैज्ञानिक असून स्वप्नरंजित नाही , हे आपले म्हणणे प्रस्थापित करणे , यापेक्षा मार्क्सने प्रतिपादन केलेल्या सर्व सिद्धांतांचा अन्य कोणताही हेतू नव्हता .
      ' वैज्ञानिक समाजवादा ' द्वारे कार्ल मार्क्सला जे अभिप्रेत होते ते हे की , त्याचा समाजवादाचा प्रकार हा अटळ आणि अपरिहार्य आहे आणि समाज त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे व त्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही . आपले हे नवे आणि विचारसरणी ( म्हणणे ) सिद्ध करण्यासाठी मार्क्सने विशेषतः ( कष्ट घेतले ) परिश्रम केलेले आहेत .
       मार्क्सची विचारसरणी ( म्हणणे ) पुढील सिद्धांतांवर आधारलेली आहे ती अशी -
१ . तत्त्वज्ञानाचा हेतू ( जगाची पुनर्रचना करणे हा असून ) विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे हे नसून विश्वाचे पुनर्निर्माण करणे हा आहे .
२ . आर्थिक शक्ती हीच मुख्यतः इतिहास घडविण्यात जबाबदार असते.
३ . समाजाची मालक व कामगार या दोन वर्गामध्ये विभागणी झालेली आहे .
४ . या दोन वर्गामध्ये नेहमीच वर्गकलह ( चालू आहे ) सुरू असतो .
५ . मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाचे नेहमीच शोषण होत असते . कामगारांच्या श्रमाचे फळ असलेल्या नफ्यांचे ( Profit ) अथवा ' अतिरिक्त मूल्या ' चा मालक वर्गाद्वारे दुरुपयोग होत असतो .
६ . ही पिळवणूक उत्पादन साधनांचे राष्ट्रीयीकरण करून म्हणजे ( खाजगी ) व्यक्तिगत संपत्ती नष्ट करून ( संपुष्टात आणता येईल ) , नष्ट करता येईल .
७ . मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाची पिळवणक हीच श्रमिक वर्गाला अधिकाधिक दुर्बल आणि दारिद्रय बनवीत आहे .
८ . कामगारांमधील ह्या वाढती दुर्बलता आणि दारिद्र्याचा परिणाम म्हणून कामगारांमध्ये क्रांतिकारी भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे वर्गकलहाचे रूपांतर वर्गलढ्यात होत आहे .
९ . कामगार हे मालकापेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राज्यसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील हे अटळ आहे . ( यालाच त्याने कामगारवर्गाची हकूमशाही असे म्हटले आहे . )
१० . या क्रांतीला कुणीही रोखू शकत नाही . त्यामुळेच समाजवाद हा अटळ आहे .
        मला आशा आहे की मार्क्सच्या समाजवादाची मूलभूत विचारसरणी मी अचूकपणे मांडलेली आहे .

No comments:

Post a Comment