Friday, September 18, 2020

भारत आणि जग

मध्ययुगाचा काळ प्रत्येक देशाच्या इतिहासात वेगवेगळा असतो . भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्याश शतका अखेरपर्यंत आहे . युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते पंधरावे शतक असा आहे . 

सामंतशाही : 

इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये रोमन साम्राज्य लयास गेले . त्यानंतर युरोपात प्रभावी अशी मध्यवर्ती सत्ता राहिली नाही . परिणामी या काळात लोकांना आपल्या जीविताची व मालमत्तेबद्दलची असुरक्षितता वाटू लागली . इसवी सनाच्या आठव्या सम्राट शार्लमनने आपल्या प्रभावाखाली युरोप संघटित करण्याचा प्रयत्न केला . शार्लमनच्या मृत्यूनंतर त्याने निर्माण केलेल्या साम्राज्याचे विघटन झाले आणि पुन्हा मध्यवर्ती सत्ता दुर्बल झाली . या परिस्थितीचा फायदा ठिकठिकाणच्या प्रदेशांतील सामंतांनी घेतला . सामंत म्हणजे सरदार . सामंतांच्या प्रभावाखाली युरोपात एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली . तिला ' सामंतशाही ' असे म्हणतात . 

प्रजेचे रक्षण करणे , आपल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था राखणे , राजाच्या वतीने न्यायदानाचे काम करणे आणि राजाच्या मदतीला जाणे इत्यादी प्रकारची कामे सामंतांना करावी लागत . सामंत आपापल्या प्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत . या वाड्याला ‘ गढी ' असे म्हणत . या गढ्यांमधून ते आपल्या प्रदेशाचा कारभार पाहत . या प्रदेशातील शेतकरी व कष्टकरी लोक सामताच्या वर्चस्वाखाली असत . सामंत सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण करत . शेती उत्पन्नाचा मोठा वाटा ते शेतकऱ्यांकडून घेत असत . कालांतराने त्यांच्या जमिनी सामंतांनी बळकावल्या , त्यामुळे अनेक शेतकरी भूदास झाले . भूदास म्हणजे स्वत : च्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर . हे शेतमजूर सामंतांच्या सेवेत असत . या शेतकरी भूदासांची स्थिती हलाखीची होती . त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे . सामंतांच्या शेतीवाडीवर त्यांना विनावेतन काम करावे लागे . 

व्यापारी वर्गाचा उदय : 

आशिया खंडातून विशेषत : भारतातून आणि आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठेत विकले जात . युरोपबरोबर होणाऱ्या या व्यापारामध्ये अरबांचा सहभाग महत्त्वाचा होता . मौल्यवान धातू , कापूस , रेशीम , साखर , चहा , कापड , मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंना युरोपीय बाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती . मध्ययुगात युरोपचा व्यापार वाढीस लागला . व्यापारविषयक विविध कामे करणारा व्यापारी वर्ग उदयास आला . युरोपात व्हेनिस , जिनोआ इत्यादी नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीस पावली . 

इस्लामचा उदय : 

इसवी सनाच्या सातव्या शतकामध्ये मुहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण दिली . ' कुरआन शरीफ ' हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे . इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितान्त श्रद्धा , त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हा होय . 

इस्लामची शिकवण : 

ईश्वर एकच असून मुहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहेत . दररोज नियमितपणे पाच वेळा प्रार्थना करावी , रमजानच्या महिन्यात उपवास करावा , आपल्या उत्पन्नातून ठरावीक रकमेचा गोरगरिबांसाठी दानधर्म करावा , आपल्या जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी , मातापित्यांविषयी आदर बाळगावा , अशी इस्लामची शिकवण आहे . 

अरबांचा उदय : 

मुहम्मद पैगंबरांच्या या शिकवणुकीचा प्रसार अरबस्तानात झाला . आशिया खंडाच्या नैर्ऋत्येला असलेल्या मोठ्या द्वीपकल्पास अरबस्तान असे म्हणतात . अरबस्तानातील लोक विविध टोळ्यांमध्ये विखुरलेले होते . या टोळ्यांमध्ये परस्परांत नेहमी संघर्ष होत असे . मुहम्मद पैगंबरांनी त्यांना संघटित केले . पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा . त्यांनी अरबांच्या सत्तेचा विस्तार केला . हा विस्तार युरोपातील स्पेनपासून भारताच्या पश्चिम सीमेवरील सिंध प्रदेशापर्यंत झाला , 

अरबांचे योगदान : 

अरबांनी कला , विज्ञान , साहित्य या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली . स्थापत्यकलेची एक सुंदर शैली निर्माण केली . या स्थापत्यशैलीची अर्धवर्तुळाकार कमान , घुमट , उंच मिनार , रेखीव नक्षीकाम व जाळीकाम इत्यादी वैशिष्ट्ये होत . स्पेनमधील कार्डोवा , इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियातील मक्का , मदिना येथील मशिदीत ही शैली आढळते . सिरियामधील दमास्कस , इराकमधील बगदाद येथील विशाल राजवाडे ही उत्कृष्ट स्थापत्यकलेची उदाहरणे आहेत . कारंजी असलेली मोठमोठी उद्याने हेही एक वैशिष्ट्य आहे . 
शिक्षण आणि साहित्यातही अरबांनी लक्षणीय प्रगती केली . स्पेनमधील कार्डोवा हे विद्यापीठ महत्त्वाचे होते . बगदादमधील मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशांतून विदयार्थी येत असत . कैरो येथील विद्यापीठात एका वेळी बारा हजार विदयार्थी शिक्षण घेत . अरबांनी प्राचीन ग्रीक व प्राचीन भारतीय वैज्ञानिक ग्रंथांची अरबीमध्ये भाषांतरे केली . खगोलशास्त्र व गणितविषयक भारतीय संकल्पना अरब लोकांमुळे पाश्चात्त्य जगाला परिचित झाल्या . जगप्रसिद्ध ' अरेबियन नाइट्स ' मधील कथांचे संकलन याच काळात झाले . 
अरब व्यापाऱ्यांनी आशिया खंडातील अनेक वनस्पती युरोपात नेल्या . संत्र्याचे पीक युरोपात रुजवले . खजुराची झाडे स्पेन व पोर्तुगालमध्ये लावली . बंदुकीची दारू , होकायंत्र , चिनीमातीची भांडी या गोष्टी त्यांनी चीनमधून युरोपात नेल्या . 

भारत आणि जग :

 मध्ययुगात आशिया खंडातील विशेषत : भारताच्या संदर्भात व्यापाराच्या बाबतीत अरबांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे . साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले . आठव्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली . तेथील दाहीर राजाचा पराभव केला . या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला . यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क , अफगाण , मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली . 

2 comments: