Wednesday, September 23, 2020

आर्थिक , सामाजिक व सांस्कृतिक जीवन

परराष्ट्र व्यापार 

    इसवी सनाच्या आठव्या व नवव्या शतकांमध्ये भारताचा बाहेरील देशाबरोबरचा व्यापार मंदावला होता . दहाव्या शतकानंतर मात्र परराष्ट्र व्यापारास पुन्हा चालना मिळाली . 

    अरब साम्राज्याच्या स्थापनेनंतर अरबांचे भारताबरोबरील व्यापारी संबंध वाढले . अरब व्यापाऱ्यांकडून भारतातील कापड , सुगंधी द्रव्ये व मसाल्याचे पदार्थ यांना मोठी मागणी होती . अरब लोक भारतात येताना खजूर व घोडे बरोबर आणत असत . भारतातून ते लिंबू , नारळ , आंबा इत्यादी पदार्थ अरबस्तानात घेऊन जात . 

    याच काळात भारताचे चीन व आग्नेय आशियातील देशांबरोबर व्यापारी संबंध वाढीस लागले . चीनमध्ये मसाल्याच्या पदार्थांना तसेच हस्तिदंत , काचेचे सामान , औषधी द्रव्ये , लाख इत्यादी पदार्थांना मोठी मागणी होती . गुजरातमधील भरूच हे महत्त्वाचे बंदर होते . केरळमधील मलबारमधून शिसम लाकूड चीनला पाठवले जाई . बंगालमधील ताम्रलिप्ती बंदरातून जावा , सुमात्रा इत्यादी बेटांकडे भारतातून व्यापारी जहाजे जात . बंगालमधील पाल राजांनी व दक्षिण भारतातील चोळांनी या व्यापारास उत्तेजन दिले . चोळ राजा पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला , व्यापाराच्या निमित्ताने अनेक भारतीय आग्नेय आशियातील देशांमध्ये गेले . व्यापाऱ्यांपाठोपाठ धर्मोपदेशकही तेथे गेले . तेथे त्यांनी हिंदू व बौद्ध विचारांचा प्रसार केला . जावा बेटांमधील बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप , तर कंबोडियातील अंकोरवट मंदिर ही या प्रभावाची उदाहरणे आहेत . 

नगरांचा विकास : 

    नव्याने उदयाला आलेल्या राजसत्तांमुळे तसेच व्यापारवाढीमुळे या काळात नगरांचा विकास झाला . मालखेड , उज्जैन , तंजावर , अजमेर इत्यादी नगरे भरभराटीस आली . राजांचे मंत्री , पदाधिकारी , सरदार , व्यापारी आणि सेवाचाकरी करणारे लोक नगरात राहत .

 व्यवसाय व उद्योग : 

    खेड्यांतील लोकांचा शेती हा महत्त्वाचा व्यवसाय होता . पावसाच्या पाण्यावर आणि नदया , तळी यांना काढलेल्या पाटाच्या पाण्यावर शेती केली जात असे . तांदूळ , बाजरी , गहू , तेलबिया , ऊस , द्विदल धान्ये , कापूस ही पिके घेतली जात . फणस , आंबे , द्राक्षे , अंजीर , कवठ इत्यादी प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जात असे . 

     शेतीव्यवसायाबरोबर इतर व्यवसायांना लोकजीवनात महत्त्व होते . लोखंड , तांबे , सोने , चांदी वगैरे धातूंवर आधारित धातू उदयोग होते . कोल्हापूर , यवतमाळ इत्यादी ठिकाणी गूळ उदयोग महत्त्वाचा होता . महाराष्ट्रातील पैठण हे पैठणीसाठी व आंध्रप्रदेशातील वरंगळ तलम कापडासाठी प्रसिद्ध होते . 

    स्थानिक पातळीवरील व्यापार वस्तुविनिमयाद्वारे होत असे . दूरच्या व्यापारासाठी सोने , चांदी व तांबे या धातूंच्या नाण्यांचा चलन म्हणून उपयोग केला जाई . यादव काळात ' पद्मटक ' हे सुवर्णनाणे होते . 

सामाजिक स्थिती : 

      भारतीय समाज जाती - उपजातींमध्ये विभागला होता . जाती जातींमधील संबंध हे रूढी , परंपरांनी निश्चित केले होते . जातीबाहेरील विवाहास बंदी होती . व्यवसाय हे जातीनिहाय होत गेले . जातिव्यवस्थेमुळे समाजातील विषमतेची दरी रुंदावत गेली . समाजव्यवस्था ही पितृप्रधान होती . स्त्रियांचे स्थान दुय्यम होते , परंतु कुटुंबातील त्यांची भूमिका महत्त्वाची होती . 

शिक्षण : 

     समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार मर्यादितच राहिला . व्यक्तीला व्यवसायाची माहिती कुटुंबामध्ये मिळत असे . या काळात नालंदा आणि विक्रमशीला या विदयापीठांची ख्याती सर्वत्र पसरली होती . येथे नेपाळ , तिबेट , चीन , म्यानमार , कंबोडिया , श्रीलंका , इंडोनेशिया इत्यादी देशांमधून विदयार्थी येत असत . 

मंदिर स्थापत्य : 

        या काळात मंदिर स्थापत्यकला विकसित झाली . भारताच्या विविध भागांत अनेक मंदिरे बांधली गेली . भव्यता , नाजूक व रेखीव शिल्पकाम , कोरीवकाम , उंच शिखरे , गोपुरे व विस्तृत आवार ही या काळातील मंदिर स्थापत्याची वैशिष्ट्ये होत . 

        महाराष्ट्रात वेरूळ येथे खोदली गेलेली लेणी जगप्रसिद्ध आहेत . त्यांपैकी कैलास मंदिर हा कोरीवकामाचा अप्रतिम नमुना आहे . दक्षिण भारतात तंजावर येथील बृहदीश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे . भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर , पुरीचे जगन्नाथ मंदिर , कोणार्कचे सूर्यमंदिर आणि | मध्यप्रदेशातील खजुराहो येथील कंडारीय महादेव मंदिर ही मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत . राजस्थानमधील अबूच्या पहाडातील दिलवाडा येथील जैन मंदिरे संगमरवरावरील कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत . कर्नाटकमधील बेलूर येथील चेन्नकेशव , तर हळेबीड येथील होयसळेश्वर या मंदिरातील कोरीवकाम अप्रतिम आहे . 

        समाजजीवनात प्रार्थनास्थळांना विशेष महत्त्व होते . या ठिकाणी उत्सव प्रसंगी जत्रा भरत . मंदिरांच्या आवारात गायन , वादन , नृत्य , मूर्तिकला , स्थापत्य इत्यादी कला शिकवल्या जात . मंदिरांमुळे या कलांचा विकास झाला . काशी , नाशिक , पैठण यांसारखी काही नगरे परंपरेने तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध होती . कांचीपुरम , मदुराई , तिरुपती इत्यादी नगरेही तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस आली . 

लघुचित्रे : 

    लघुचित्रे म्हणजे लहान आकाराची चित्रे . हस्तलिखित ग्रंथ सुशोभित करण्यासाठी त्यामध्ये लघुचित्रे काढण्यात येऊ लागली . बंगालमधील पाल राजांनी लघुचित्रे काढण्याच्या शैलीस प्रोत्साहन दिले . बौद्ध व जैन साहित्यात लघुचित्रे असलेले ग्रंथ आजही उपलब्ध आहेत . 

साहित्य :

     या काळात संस्कृत , तमीळ , तेलुगु , कन्नड इत्यादी प्रादेशिक भाषांमध्ये विविध विषयांवर साहित्यनिर्मिती झाली . 

    जयदेवाने ' गीतगोविंद ' हे काव्य लिहिले . या काव्यात कृष्णभक्तीचा महिमा सांगितला आहे . कल्हणाने ' राजतरंगिणी ' ग्रंथ लिहिला . या ग्रंथात त्याने प्राचीन काळापासून ते इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंतचा काश्मीरचा इतिहास सांगितला आहे . इसवी सनाच्या बाराव्या शतकात भास्कराचार्य हा सर्वश्रेष्ठ गणिती होऊन गेला . त्याने ' सिद्धान्तशिरोमणी ' हा ग्रंथ लिहिला . पंप याने कन्नड भाषेमध्ये ' आदिपुराण ' , ' पंपभारत ' ही महाकाव्ये लिहिली . कवी कंबन याने तमीळ भाषेमध्ये रामायण लिहिले . मुकुंदराजाने ' विवेकसिंधू ' या नावाचा मराठी भाषेमधील ओवीबद्ध ग्रंथ लिहिला . मुकुंदराजास मराठी भाषेचा आदय कवी मानले जाते .

Friday, September 18, 2020

भारत आणि जग

मध्ययुगाचा काळ प्रत्येक देशाच्या इतिहासात वेगवेगळा असतो . भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्याश शतका अखेरपर्यंत आहे . युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते पंधरावे शतक असा आहे . 

सामंतशाही : 

इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये रोमन साम्राज्य लयास गेले . त्यानंतर युरोपात प्रभावी अशी मध्यवर्ती सत्ता राहिली नाही . परिणामी या काळात लोकांना आपल्या जीविताची व मालमत्तेबद्दलची असुरक्षितता वाटू लागली . इसवी सनाच्या आठव्या सम्राट शार्लमनने आपल्या प्रभावाखाली युरोप संघटित करण्याचा प्रयत्न केला . शार्लमनच्या मृत्यूनंतर त्याने निर्माण केलेल्या साम्राज्याचे विघटन झाले आणि पुन्हा मध्यवर्ती सत्ता दुर्बल झाली . या परिस्थितीचा फायदा ठिकठिकाणच्या प्रदेशांतील सामंतांनी घेतला . सामंत म्हणजे सरदार . सामंतांच्या प्रभावाखाली युरोपात एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली . तिला ' सामंतशाही ' असे म्हणतात . 

प्रजेचे रक्षण करणे , आपल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था राखणे , राजाच्या वतीने न्यायदानाचे काम करणे आणि राजाच्या मदतीला जाणे इत्यादी प्रकारची कामे सामंतांना करावी लागत . सामंत आपापल्या प्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत . या वाड्याला ‘ गढी ' असे म्हणत . या गढ्यांमधून ते आपल्या प्रदेशाचा कारभार पाहत . या प्रदेशातील शेतकरी व कष्टकरी लोक सामताच्या वर्चस्वाखाली असत . सामंत सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण करत . शेती उत्पन्नाचा मोठा वाटा ते शेतकऱ्यांकडून घेत असत . कालांतराने त्यांच्या जमिनी सामंतांनी बळकावल्या , त्यामुळे अनेक शेतकरी भूदास झाले . भूदास म्हणजे स्वत : च्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर . हे शेतमजूर सामंतांच्या सेवेत असत . या शेतकरी भूदासांची स्थिती हलाखीची होती . त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे . सामंतांच्या शेतीवाडीवर त्यांना विनावेतन काम करावे लागे . 

व्यापारी वर्गाचा उदय : 

आशिया खंडातून विशेषत : भारतातून आणि आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठेत विकले जात . युरोपबरोबर होणाऱ्या या व्यापारामध्ये अरबांचा सहभाग महत्त्वाचा होता . मौल्यवान धातू , कापूस , रेशीम , साखर , चहा , कापड , मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंना युरोपीय बाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती . मध्ययुगात युरोपचा व्यापार वाढीस लागला . व्यापारविषयक विविध कामे करणारा व्यापारी वर्ग उदयास आला . युरोपात व्हेनिस , जिनोआ इत्यादी नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीस पावली . 

इस्लामचा उदय : 

इसवी सनाच्या सातव्या शतकामध्ये मुहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण दिली . ' कुरआन शरीफ ' हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे . इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितान्त श्रद्धा , त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हा होय . 

इस्लामची शिकवण : 

ईश्वर एकच असून मुहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहेत . दररोज नियमितपणे पाच वेळा प्रार्थना करावी , रमजानच्या महिन्यात उपवास करावा , आपल्या उत्पन्नातून ठरावीक रकमेचा गोरगरिबांसाठी दानधर्म करावा , आपल्या जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी , मातापित्यांविषयी आदर बाळगावा , अशी इस्लामची शिकवण आहे . 

अरबांचा उदय : 

मुहम्मद पैगंबरांच्या या शिकवणुकीचा प्रसार अरबस्तानात झाला . आशिया खंडाच्या नैर्ऋत्येला असलेल्या मोठ्या द्वीपकल्पास अरबस्तान असे म्हणतात . अरबस्तानातील लोक विविध टोळ्यांमध्ये विखुरलेले होते . या टोळ्यांमध्ये परस्परांत नेहमी संघर्ष होत असे . मुहम्मद पैगंबरांनी त्यांना संघटित केले . पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा . त्यांनी अरबांच्या सत्तेचा विस्तार केला . हा विस्तार युरोपातील स्पेनपासून भारताच्या पश्चिम सीमेवरील सिंध प्रदेशापर्यंत झाला , 

अरबांचे योगदान : 

अरबांनी कला , विज्ञान , साहित्य या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली . स्थापत्यकलेची एक सुंदर शैली निर्माण केली . या स्थापत्यशैलीची अर्धवर्तुळाकार कमान , घुमट , उंच मिनार , रेखीव नक्षीकाम व जाळीकाम इत्यादी वैशिष्ट्ये होत . स्पेनमधील कार्डोवा , इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियातील मक्का , मदिना येथील मशिदीत ही शैली आढळते . सिरियामधील दमास्कस , इराकमधील बगदाद येथील विशाल राजवाडे ही उत्कृष्ट स्थापत्यकलेची उदाहरणे आहेत . कारंजी असलेली मोठमोठी उद्याने हेही एक वैशिष्ट्य आहे . 
शिक्षण आणि साहित्यातही अरबांनी लक्षणीय प्रगती केली . स्पेनमधील कार्डोवा हे विद्यापीठ महत्त्वाचे होते . बगदादमधील मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशांतून विदयार्थी येत असत . कैरो येथील विद्यापीठात एका वेळी बारा हजार विदयार्थी शिक्षण घेत . अरबांनी प्राचीन ग्रीक व प्राचीन भारतीय वैज्ञानिक ग्रंथांची अरबीमध्ये भाषांतरे केली . खगोलशास्त्र व गणितविषयक भारतीय संकल्पना अरब लोकांमुळे पाश्चात्त्य जगाला परिचित झाल्या . जगप्रसिद्ध ' अरेबियन नाइट्स ' मधील कथांचे संकलन याच काळात झाले . 
अरब व्यापाऱ्यांनी आशिया खंडातील अनेक वनस्पती युरोपात नेल्या . संत्र्याचे पीक युरोपात रुजवले . खजुराची झाडे स्पेन व पोर्तुगालमध्ये लावली . बंदुकीची दारू , होकायंत्र , चिनीमातीची भांडी या गोष्टी त्यांनी चीनमधून युरोपात नेल्या . 

भारत आणि जग :

 मध्ययुगात आशिया खंडातील विशेषत : भारताच्या संदर्भात व्यापाराच्या बाबतीत अरबांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे . साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले . आठव्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली . तेथील दाहीर राजाचा पराभव केला . या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला . यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क , अफगाण , मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली .